Login

Login page

Simple Login Page

Username Password

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

तुळस

तुळस
शास्त्रीय नाव - Oscimum sanctum (ऑसिमम सँक्टम) (होली बेसिल)
काही भारतीय नावे - वृंदा (बंगाली), मंजिरी (संस्कृत), बिंदा, गग्गेरू( तेलुगू), भूतघ्नी, बहुमंजरी, अजेतराक्षसी, गौरी, अमृता, श्रेष्ठतमा.
tulas-better-snap.jpgकुळकथा - ऑसिमम या संज्ञेचे मूळ ग्रीक शब्दात आहे. त्याचा अर्थ मधुर वनस्पती. सँक्टम म्हणजे पवित्र. तुलसी म्हणजे एकमेव, अद्वितीय. वृंदा म्हणजे फुलांचा घोस.
प्राचीन काळी मंदिरे ही पांथस्थांची आश्रयस्थाने होती. मंदिरांच्या प्रांगणांत तुळशी लावलेल्या असत. तृषा शमवण्याचा उत्तम गुणधर्म तुलसीपत्रात आहे. चार पाने जिभेखाली ठेवली, तर थकल्या-भागल्या, तहानलेल्या पांथस्थाची तहान कमी होते. काळाच्या ओघात तुळशीचा हा गुणधर्म स्मृतीआड झाला आणि मंदिरांच्या प्रांगणांत तुळशीला धार्मिक वनस्पती म्हणून महत्त्व आले.
तुळस ही एक लहानशी, उभी वाढणारी शाखायुक्त वनस्पती असून तिच्या सर्वांगावर लव असते. पानांच्या कडा दंतुर असून त्यावरील तैलग्रंथी ठिपक्यांसारख्या असतात आणि पाने चुरल्यावर त्यांना उग्र वास येतो. फांद्यांच्या टोकांशी पुष्पमंजिर्‍या येतात. फुले आकाराने लहान, फिकट गुलाबी जांभळ्या रंगाची असतात. फळे अतिशय लहान आकारमानाची असून बिया तांबूस तपकिरी असतात.
तुळस औषधी आहे. तिची पाने सर्दी, पडसे, खोकल्यावर गुणकारी असतात. बिया पचनसंस्थेच्या विकारांवर उपयोगी आहेत. पानांपासून निघणारे तेल जंतुघ्न असून त्वचारोगांत वापरतात. कीटकनिवारक, विशेषतः मलेरियाच्या डासांचा प्रतिकार करण्याकरता संपूर्ण वनस्पतीच सज्ज असते. ओझोनकर्ता, प्रदूषणहर्ता अशी तुळस आजूबाजूची हवा शुद्ध करते.
पर्यावरणीय आणि वैद्यकीयदृष्ट्या अतिशय उपयुक्त अशा तुळशीला पूर्वजांनी मानाचं स्थान दिलं. फूल, फळ, छाया याबाबतीत दुय्यम असणारी तुळस सामान्यजनांकडून दुर्लक्षिली जाऊ नये म्हणून तिला धार्मिक अवगुंठन घालून त्यांनी नित्यपूजनीय ठरवलं. एक हजार एकशे आठ तुळशी वाहिल्याशिवाय श्रीकृष्णजन्माचा सोहळा पूर्ण होत नाही. नैवेद्य दाखवताना वरण-भाताच्या मुदीवर तुळशीचे पान ठेवले जाते, ते तिचा वातावरण शुद्ध राखण्याचा गुणधर्म लक्षात घेऊन. या नाजूक रोपाला रोज पाणी मिळेल, त्याचे वृंदावनांत संगोपन होईल अशी व्यवस्था केली. कुठच्याही आडवेळी खुडण्यास मनाई केली.
हिंदुधर्मात श्रीविष्णूची पूजा करताना तुळस अत्यावश्यक मानली गेली आहे. पद्मपुराणात सांगितले आहे, की तुळशीच्या रोपाभोवतालची मातीसुद्धा पवित्र असते. जर एखाद्या प्रेताचे दहन करताना चितेवर तुळशीच्या काड्या घातल्या तर त्या माणसाचा आत्मा कायम विष्णुलोकात राहतो, त्याचा पुनर्जन्म होत नाही, अशी हिंदुधर्मात समजूत आहे. पूजेसाठी दिवा लावताना त्यात तुळशीची काडी घातली, तर लाखो दिवे लावल्याचे श्रेय लाभते.
तुळस म्हणजे विष्णुपत्नी लक्ष्मीचा अवतार. कृष्णाची राधा म्हणजे तुळसच. बालपणी कृष्ण मथुरेजवळच्या ज्या उपवनात राधेबरोबर क्रीडा करत असे, त्या उपवनाला वृंदावन असे म्हणतात. वृंदा म्हणजे राधा, म्हणून तुळशीला वृंदा असेही नाव आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल द्वादशीला तुळशीचे लग्न समारंभपूर्वक बाळकृष्णाशी लावण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल