Login

Login page

Simple Login Page

Username Password

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

केळी

केळी
लॅटिन नाव - Musa paradisiaca / Musa sapientum (मुसा पॅराडिसियाका/मुसा सॅपिएंटम)
इंग्रजी नाव - बनाना, प्लँटेन, अ‍ॅपल ऑफ पॅराडाईझ
भारतीय नावे - बाळे (कानडी), कदली, केला(हिंदी), वझह (मल्याळी), मोच, रंभा (संस्कृत), आरती (तेलुगू),
कुल - केळी कुल
kel-1.jpgकुळकथा - ऑक्टेव्हियस ऑगस्टस सीझर याचा जो वैद्य होता, त्याचे नाव होते अँटोनियो मुसा. त्याचेच नाव केळीला दिले गेले. 'पॅराडिसियाका'चा अर्थ स्वर्गीय. केळी स्वर्गातून इथे आल्या असे मानले जाते. ईडनच्या उद्यानात केळी फोफावल्या होत्या. अ‍ॅडम आणि ईव्ह यांनी केळीची पाने वस्त्रे म्हणून परिधान केली होती. मोच या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो रसाळ, दुसरा अर्थ विरागी. ज्याने इहलोकाच्या आशाआकांक्षांवर पाणी सोडले आहे असा. आश्चर्याची बाब म्हणजे सॅपिएन्टमचा अर्थसुद्धा शहाणा किंवा साधू असाच आहे. कदली म्हणजे ध्वज किंवा पताका. केला या हिंदी शब्दाचा अर्थ हलणारे किंवा थरथरणारे.
kel-2.jpgदारात केळीचा खांब रोवलेला दिसला. की शुभकार्याची आपसूक वार्ता मिळते. केळफुलाच्या किरमिजी पाकळ्यांच्या पदराआडून डोकावणार्‍या केळीच्या फण्या म्हणजे सुबत्तेचं, भरभराटीचं, वंशवाढीचं प्रतीक.
केळीचं झाडं दिसतंही किती शुभलक्षणी. पानं हिरवीगार, लुसलुशीत, सदा टवटवीत. ही एक बहुवर्षायू औषधी वनस्पतीच आहे. ती अतिशय जोमाने वाढते आणि एका वर्षात फळे देते. केळीचे खोड म्हणजे खरे खोड नव्हेच, खरे खोड एका कंदाच्या स्वरूपात असते. वरचे खोड म्हणजे पर्णतळाच्या एकात एक अशा बंदिस्त रचनेतून निर्माण होणारा खोडासारखा भास.
केळी, म्हणजे या वनस्पतींची फळे म्हणजे जणू लांबलचक, लवलवती, रसरशीत बोटेच. त्यांच्या साधारणतः १०-१२ फळांच्या फण्या असतात. प्रत्येक झाडाला अशी अनेक फळे येतात. फळाची साल अपरिपक्व अवस्थेत हिरवी जाडसर असते. पिकल्या फळाची साल मात्र पिवळी, कधी गुलाबीही असते. गर मधुर, बिनबियांचा असतो.
फळात अनेक खजिने असतात. लोह, कॅल्शियम, पोटॅशियम. त्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते. बालकाचा पहिला घन आहार म्हणून केळे देण्याची प्रथा आहे. कारण ते पचायला सोपे असते. कच्च्या केळ्यांची भजी, भाजी करतात. पाने जेवणासाठी वापरतात. रानकेळीची लागवड शेतीच्या बांधावर केली, की वाळवीचा उपद्रव कमी होतो.
लोककथा - केळी हा पार्वतीचा अवतार आहे, कारण केळीची पुनरुत्पत्ती स्त्रीबीज व पुंबीज यांच्या मीलनाशिवायच होते. गडचिरोलीतील आदिवासी लोकांमध्ये एक लोककथा आहे यासंदर्भात. पाच बहिणी होत्या. आंबा, चिंच, केळी, अंजीर आणि जांभूळ. इस्पुर देव त्यांचा पिता. तो काळजीत पडून त्यांच्यासाठी वर शोधत होता. इतर बहिणींना पती आणि खूप मुले हवी होती. पण केळीला आपल्या सौंदर्याचा नकोइतका अभिमान होता. ती म्हणाली मला पती नकोच आहे, मुलं पण थोडीच हवीत. मला लवकर म्हातारं आणि बोजड दिसायचं नाही. तसंच झालं. बहिणींना इतकी मुलं झाली, की मोजदादसुद्धा करता येईना. त्यांचं करता करता त्या मरून गेल्या आणि त्यांची झाडं झाली. त्यांचे केस त्यांच्या फांद्या झाल्या आणि मुलांचं रूपांतर फळांत होत राहिलं. केळीला नवरा नकोच होता आणि मुलं अगदी कमी. ती तजेलदार, सदा टवटवीत राहिली. वर्षातून एकदाच तिला फळे येत राहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल