Login

Login page

Simple Login Page

Username Password

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

केवडा

केवडा
लॅटिन नाव - Pandenus tectorius (पॅंडेनस टेक्टोरिअस, पॅंडेनस ओडोराटिसिमस)
इंग्रजी नाव - स्क्रू पाईन
भारतीय नावे - केया(बंगाली), केतकी (संस्कृत), तालेमारा ( कानडी), थाझाई (तमीळ), मुगली ( तेलुगू)
कुल - केतकी कुल
kevada-pandanus-adoratissimus.jpgकुळकथा - पांदन म्हणजे काठीवाला असा मूळ मल्याळी शब्द आहे. त्याच्या लॅटिनीकरणातून पॅंडेनस हे वानसशास्त्रीय प्रजातीवाचक नाम तयार झाले. केतकी कुलातील सर्वच सदस्यांना हे मल्याळी नाव आहे. टेक्टोरिअस या जातीविशेषणाचा अर्थ आच्छादन असा आहे. ओडिराटिसिमस याचा अर्थ सुगंधी असा होतो.
संस्कृत प्राचीन वाङ्मयात केवड्याचा उल्लेख वारंवार येतो. समुद्रकिनार्‍यावरच्या मासळीच्या वासाला उतारा म्हणून केवड्याची बने फ़ुलतात, असा त्यात संकेत आहे. फुलांचा आकार काहीसा हंसासारखा असतो. आणि ती केसांत माळतात. किनार्‍यावरच्या खेड्यांतून केवड्याचे कुंपण घालतात.
केवड्याची बेटे असतात. ही एक मध्यम उंचीची वनस्पती आहे. खोडाला फांद्या फुटतात आणि आधारासाठी मजबूत हवाई मुळे येतात. पाने तलवारीच्या पात्यांसारखी असतात. पाने जवळजवळ एक मीटरभर लांब असतात. आणि त्यांची खोडावरची रचना सर्पिल असते.
फुले दोन प्रकारांतील असतात : नर आणि स्त्रीपुष्पे. नरपुष्पांच्या कणसांना पिवळट सोनेरी छद असतो आणि ते सुगंधी असतात. स्त्रीपुष्पांना वास नसतो.
फळ काहीसे अननसासारखे, भरभक्कम बाठयुक्त, गोलाकार आणि वस्तुत: अनेक फळांचे बनलेले संयुक्त फळ असते. ते प्रथम पिवळे आणि पिकल्यावर रक्तवर्णी होते.
केवड्याच्या पानांच्या चटया विणतात. तसेच त्यापासून कागद तयार करता येतो. पानांपासून निघणार्‍या धाग्यांची मासेमारीसाठी जाळी विणतात. ब्रशचे झुबके करतात आणि हवाई मुळांपासून मिळणार्‍या धाग्यांपासून टोपल्या, टोप्या अणि ब्रश करतात. नरपुष्पांच्या छदापासून अत्तर काढतात. मिठाईतही तो वापरतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी कालव्यांच्या कडेने केवड्यांची लागवड करतात.
जहांगीर बादशहाने 'तुझुक-ई-जहांगिरी' या पुस्तकात आपल्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यामध्ये भारतातील प्रमुख फुलांविषयी लिहिताना केवड्याबद्दल त्याने म्हटले आहे, "या फुलाचा सुगंध अत्यंत उग्र, दूरवर दरवळणारा असतो. इतका, की कस्तुरीचा वासही त्याच्यापुढे फिका पडतो."
कोकणच्या किनारपट्ट्यांवरील मुसलमान कोळ्यांच्या वस्त्यांत एक अत्यंत सुंदर लोकगीत म्हटले जाते. त्याचा अर्थ असा ,"केवड्याच्या झाडांमागून सूर्य उगवत आहे, चंद्र डोळ्यांत सुरमा लावतो आहे, सौम्य चंद्रप्रकाशाने रात्र न्हाऊन निघाली आहे."
लोककथा - विष्णू आणि ब्रह्मदेवामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद जुंपला. शंकर म्हणाले, "या वादाचा निकाल मी एक सोपी परीक्षा घेऊन लावतो. माझे पाय किंवा माझे डोके तुम्हां दोघांपैकी जो आधी शोधून काढेल, तो श्रेष्ठ." इतकं बोलून शंकर गुप्त झाले.
त्यानंतर शंकरांनी एवढे विशाल रूप धारण केले, की त्यांचे पाय किंवा डोक्याचा थांगच लागेना. विष्णू आणि ब्रह्मदेव दोघेही खूप गोंधळून गेले.
मग त्यांनी वेगवेगळ्या दिशांना जाऊन शोध घ्यायचे ठरवले. डुकराचे रूप धारण करून विष्णू पाताळातील सर्वांत खालच्या भागात गेले. त्यांनी रागारागात जमीन खणली, तरी त्याला शंकरांचे पाय काही सापडेनात.
इकडे ब्रह्मदेव हंसपक्ष्यावर बसून उंच उंच उडून आले, पण त्यांनाही शंकरांचे डोके काही सापडले नाही.
निराश होऊन दोघे अरण्याकडे परतत असताना एक केवड्याचे पान आभाळातून खाली पडताना ब्रह्मदेवांना दिसले. शंकर नेहमी कपाळावर केवडा धारण करतात, हे ब्रह्मदेवांना ठाऊक होते. त्यांनी ते पान पकडले आणि विष्णूकडे जाऊन ते म्हणाले, "मला शंकरांचे डोके सापडले आहे. पुरावा म्हणून मी त्यांच्या कपाळावरील हे पान उचलून आणले आहे." विष्णूचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसेना. ते केवड्याला म्हणाले, "हे खरे आहे काय?"
केवड्याने ब्रह्मदेवांची बाजू घ्यायला बढाई मारत सांगितले, "हो खरे आहे. मीच शंकरांच्या कपाळावरील केवड्याचे पान." शंकरांनी ते ऐकले आणि संतापून त्यांनी या खोटेपणाबद्दल केवड्याला शाप दिला आणि त्यांच्या देवळाच्या आसपासही केवड्याला प्रवेश करायला बंदी घातली. तेव्हापासून केवड्याला इतका अलौकिक सुवास येत असूनही त्याचे पान शंकराला कधीही वाहत नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल