Login

Login page

Simple Login Page

Username Password

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

कदंब

कदंब
लॅटिन नाव - Anthocephalus cadamba (अ‍ॅंथोसिफॅलस कदंब)
इंग्रजी नाव - कदंब
काही भारतीय नावे - कदंब, कदम, अट्टुटेक, नीपा, मंजा.
कुळकथा - अ‍ॅंथॉस या संज्ञेचा अर्थ फुले. सिफॅलास म्हणजे शिर किंवा डोके. फुलांच्या चेंडूसारख्या गुच्छामुळे हे नाव या वृक्षाला पडले. कदंब एक भव्य वृक्ष असून तो पानगळी जातीचा आहे. याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात.
kadamb.jpgपानांची फांदीवरील रचना जोडीजोडीची असते. ती आकारमानाने मोठी, अंडाकृती व तळाशी हृदयाकार असतात. पाने तुकतुकीत असून त्यांवर थोडी लव असते. कोवळ्या पानांना तांबूस झाक असते. पानांवरील उपशिरा ठळक आणि समांतर असतात.
फुले आकाराने अतिशय बारीक आणि पिवळट सोनेरी असतात. त्यांची मांडणी चेंडूच्या आकारासारखी असते. फुलांतून बाहेर पडणार्‍या कुक्षीवृंतांची प्रभा फुलांच्या गुच्छाभोवती फाकते आणि एक वलय निर्माण होते. म्हणूनच 'सोनेरी किरणांची प्रभा म्हणजे एक अद्भुत खजिना' असे त्याचे वर्णन केले आहे.
फळे अतिशय बारीक असतात. फुलांप्रमाणेच त्यांचा घोस तयार होतो. मात्र हा गेंद काळ्या रंगाचा असतो.
प्लायवुड आणि आगकाड्या तयार करण्यासाठी कदंबाचे लाकूड वापरतात. त्याची साल जंतुघ्न म्हणून उपयुक्त आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र, विशेषतः कोकण विभागात तसेच मुंबईतही अनेक ठिकाणी कदंबाचे हे केशरी गोल दिवे लगडल्यासारखे दिसणारे देखणे झाड पाहायला मिळते. या झाडाचा डेरा फार सुंदर छत्रासारखा पसरलेला असतो. दुर्गाबाई भागवतांनी तर केवळ या फुलावर एक खूप सुंदर, लालित्यपूर्ण भाषेतलं, अभ्यासू पुस्तक लिहिले आहे.
संस्कृत वाङ्मयात कदंबाचे साहचर्य मोसमी पावसाळ्याच्या ऋतूशी जोडलेले आढळते. ढगांचा गडगडाट कानी आला, म्हणजेच कदंब फुलू लागतो. पावसाच्या संगतीने येणारा वारा कदंबाच्या फुलांचा सुवास घेऊनच वाहतो. म्हणून त्या वार्‍याला कदंबनील म्हणतात. पूर्ण बहरलेल्या कदंबवृक्षाच्या ठायीठायी जमून राहिलेले पावसाचे पाणी मधाने भरलेल्या पाण्यासारखे गोड लागते, म्हणून त्याला कदंबरी म्हणतात.
स्कंदपुराणामध्ये कृष्ण आपल्या सवंगड्यांसमवेत या कदंबांच्या चेंडूंशी खेळत असल्याचे मनोहारी उल्लेखही मिळतात. श्रीकृष्ण आपली बासरी वाजवत कदंबाखालीच उभा राहतो. अतिविषारी कालिया नाग कालिया दाह डोहात राहू लागला. त्याच्या फुत्कारांमुळे त्याच्यापासून काही मैलांच्या अंतरावर असलेले प्राणी, वृक्ष-वनस्पती जळून गेले. फक्त त्या डोहाच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या भूप्रदेशावर एक कदंबवृक्ष मात्र जिवंत राहू शकला. त्याचे कारण स्वर्गलोकात अमृत प्राशन करून गरुड पृथ्वीवर परतत असताना या वृक्षावर बसला होता आणि त्याने आपली चोच फांदीला घासली. तेव्हा चोचीतले काही अमृताचे थेंब या वृक्षावर पडले आणि त्याला अमरत्व प्राप्त झाले.
देवांनी अमरत्व दिलेल्या कदंबावर माणसांच्या राज्यात मात्र समूळ नष्ट होण्याची वेळ आली. महाराष्ट्रात गेली काही वर्षे विकासाच्या नावाखाली जी अनिर्बंध वृक्षतोड चालू आहे, त्यात कदंबाच्या वृक्षांवरही घाला आला आहे. काही वर्षांनी या सुंदर झाडांचे उल्लेख "कदंबतरूला बांधुनी दोले, उंच खालती झोले, परस्परांनी दिले घेतले गेले ते दिन गेले." अशा काव्यपंक्तींमध्येच करावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद आपण दिलेल्या सूचनेला लवकरच प्रतिसाद दिला जाईल